साताऱ्याची एक अविस्मरणीय सहल!
सातारा हे सह्याद्रीतल्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं शहर. निसर्गाने या जिल्ह्याला खूप काही भरभरून दिलं. मग ते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर,पाचगणी असो वा समर्थ रामदास स्वामी यांची समाधी असलेला सज्जनगड असो,ठोसेघर,वासोटा किल्ला असो किंवा कोयना,कृष्णा या नद्यांचे उगम स्थान असो. कासचे पुष्प पठार हे जैवविविधतेने नटलेले सुंदर ठिकाण. पर्यटक या जिल्ह्याला वर्षभर भेट देत असतात. आम्ही देखील फेब्रुवारी महिन्यात वज्राई धबधबा आणि कास तलाव बघायला जायचं असं ठरवलं. दिवस होता २ फेब्रुवारीचा. पहाटे ३:३०ला उठून सगळ्यांची तयारी सुरू झाली. ५च्या आसपास आम्ही साताऱ्याच्यादिशेने रवाना झालो. सकाळची गुलाबी थंडी मनाला सुखावणारी होती. जिथे नजर जाईल तिथे दाट धुके दिसत होते. खंडाळा येथील खंबाटकी घाटात असताना सूर्योदय होत होता. सूर्याचे ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटत होते. ८ वाजताच्या सुमारास आम्ही साताऱ्यातील कुरणेश्वर मंदिरात पोहचलो. देवाचं दर्शन घेऊन गरम पोह्यांवर ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. त्या दरीतील नद...